महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. दहावीच्या परीक्षेचा यंदाचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला असून या निकालांमध्ये गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम राखत कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकणचा निकाल यंदा सर्वाधिक लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. दुसरीकडे मुलांचा व मुलींचा विचार करता यंदादेखील मुलींनीच निकालात बाजी मारली असून मुलांपेक्षा वरचढ कामगिरी केली आहे.
यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली असून कोकणचा निकाल ९८.८२ टक्के इतका लागला आहे. कोकणपाठोपाठ कोल्हापूर विभाग असून कोल्हापूरचा निकाल ९७.४५ टक्के इतका लागला आहे. कोल्हापूरपाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागतो. मुंबई विभागाचा निकाल ९५.८४ टक्के इतका लागला आहे.
दरम्यान, यंदा सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. नागपूर विभागात एकूण परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी दहावीच्या परीक्षेत ९०.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शेवटच्या चार विभागांमध्ये अमरावती विभाग (९२.९५ टक्के), छत्रपती संभाजीनगर विभाग (९२.८२ टक्के) आणि लातूर विभाग (९२.७७ टक्के) यांचा समावेश आहे.
विभागनिहाय SSC निकाल… (सर्वाधिक ते सर्वात कमी क्रमाने)
कोकण विभाग – ९८.८२ टक्के
कोल्हापूर विभाग – ९७.४५ टक्के
मुंबई विभाग – ९५.८४ टक्के
पुणे विभाग – ९४.८१ टक्के
नाशिक विभाग – ९३.०४ टक्के
अमरावती विभाग – ९२.९५ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ९२.८२ टक्के
लातूर विभाग – ९२.७७ टक्के
नागपूर – ९०.७८ टक्के


