अहिल्यानगर-तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावात घडलेल्या दोन भीषण रस्ते अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला असून, दोन्ही घटनांमध्ये संबंधित वाहनचालक अपघातानंतर पसार झाले आहेत. या दोन्ही प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना चास शिवार परिसरातील हॉटेल भाग्यश्री समोर घडली. अज्ञात थार वाहनावरील चालकाने भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवत रस्ता ओलांडत असलेल्या संदीप सुरेश चव्हाण (रा. मांजरी बु., जि. पुणे) यांना जोरदार धडक दिली. या अपघातात संदीप चव्हाण यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी सतिष शामराव चव्हाण (वय 32, रा. कवरदरी, ता. मालेगाव, जि. वाशिम) यांनी सोमवारी (16 मार्च) दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, दुसरी घटना अहिल्यानगर- दौंड मार्गावरील अरणगाव (ता. अहिल्यानगर) परिसरात घडली. शिलाजित गणपत सोनटक्के (रा. चोराखळी, ता. कळेब, जि. धाराशिव) हे रस्त्यावर असताना अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होऊन मयत झाले. अपघातानंतर वाहनचालकाने जखमीस मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दादाहरी त्रिंबक चंदनशिवे (वय 32, रा. शिराळे, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी (16 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


