कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव सिमेंट मिक्सरने प्रवाशांनी भरलेल्या काळी-पिवळी इको टॅक्सीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही इको कार कल्याण ते मुरबाड या मार्गावर प्रवासी वाहतूक करत होती. पाच आसनांच्या या गाडीत १२ प्रवासी कोंबून भरले होते. ही गाडी सुसाट वेगाने मुरबाडच्या दिशेने जात होती. याचवेळी रायते पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकची आणि इको कारची समोरासमोर भीषण धडक झाली.
हा अपघात इतका भयानक होता की, धडक बसल्यानंतर इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सिमेंट मिक्सरच्या प्रचंड वेगामुळे कारचा पूर्णपणे चक्काचूर होऊन तिचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर इको कार प्रवाशांना घेऊन महामार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला भीषण धडक दिली. ही धडक इतकी वेगवान होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची साधी संधीही मिळाली नाही.
स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या इको कारमध्ये एकूण ९ प्रवासी प्रवास करत होते. धडक बसताच झालेल्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. कारमधील ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. जखमी प्रवाशाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले. चक्काचूर झालेल्या पत्र्यांमध्ये मृतदेह अडकल्याने ते बाहेर काढताना बचावकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पोलिसांनी अद्याप मृतांचा अधिकृत आकडा स्पष्ट केला नसला तरी, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सिमेंट मिक्सरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले की वेगाच्या अतिरेकामुळे हा अपघात घडला, याचा शोध टिटवाळा पोलीस घेत आहेत. महामार्गावर झालेला हा भीषण अपघात पाहता, या ठिकाणी वाहतूक सुरक्षा आणि वेगमर्यादेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या भीषण अपघातामुळे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी क्रेन पाचारण केली असून, वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, दोन्ही वाहनांच्या चालकांबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. महामार्गावर रक्ताचा सडा आणि वाहनाचा ढिगारा पाहून उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आले होते.


