दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर स्वतंत्र बैठक लावू -सीईओ आनंद भंडारी
दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत सत्कार
अहिल्यानगर- जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब यांचा शासनमान्य महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या ज्या अडचणी असतील, त्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, तसेच दिव्यांगासाठी राखीव असलेला पाच टक्के निधी त्यांच्यासाठीच खर्च करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री साहेबराव अनाप , राज्यसह कोषाध्यक्ष संतोष सरवदे, सचिव केंद्रप्रमुख पोपट धामणे ,मुख्याध्यापक राजेंद्र ठूबे ,सुखदेव ढवळे, सोमनाथ रोहोकले आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करून संघटनेच्या मागणीचे निवेदन दिले. त्यामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना साधने उपकरणे लवकर मिळावी, दिव्यांग शिक्षकांचे विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख प्रमोशन व्हावे तसेच जन्मापासून दिव्यांग असलेले व अनेकवेळा तपासणी झालेल्या दिव्यांगांना वारंवार तपासणीसाठी पाठवू नये, अशी विनंती संघटनेने केली.
चौकट
यावेळी संघटनेच्या वतीने बोगस अपंग शोधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांची एक संयुक्त समिती स्थापन करून या समिती पुढे दिव्यांग कर्मचाऱ्यांना बोलावून प्रत्यक्ष पाहणी करून, प्रमाणपत्रे तपासून योग्य तो निर्णय घ्यावा, जेणेकरून खऱ्या दिव्यांगांना वारंवार तपासणीसाठी जावे लागणार नाही,अशी संघटनेच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आली. यावर त्यांनी याबाबत आपण स्वतंत्र बैठक लावून योग्य धोरण ठरवू, असे आश्वासित केले.


