पीएम किसान सन्मान योजनेच्या १८१ बोगस मुस्लिम लाभार्थ्यांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात तालुका कृषी अधिकारी एम जी म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन भादवी कलम ४१७, ४६५,४६८ आयटी, ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळवणमधील भादवण गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना येथे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे १८१ लाभार्थी लाभ घेत होते. ग्रांमस्थानी ही बाब कळवण तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांतअधिकारी यांना निवेदन देऊन निदर्शनात आणून दिली. मात्र, याबाबत काहीही कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी मालेगाव येथील बोगस आधार कार्ड व रेशन कार्ड तयार करून बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी मुस्लिमांचा शोध लावणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची मुंबई येथे भेट घेऊन तालुक्यातील पीएम किसान योजनेत कसा घोटाळा सुरु आहे हे निदर्शनास आणून दिले होते.
त्यानंतर या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कळवण गाठत येथील प्रशासकीय कार्यालयातील कृषी विभागात उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे, तालुका कृषी अधिकारी मीनल म्हस्के, तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याशी चर्चा करून माहिती घेत पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार कळवण पोलीस ठाण्यात तालुका कृषी अधिकारी एम जी म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन भादवी कलम ४१७, ४६५,४६८ आयटी, ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेंकर करीत आहेत.
सन २०२० ते २०२२ या काळात पीएम किसान सन्मान योजनेचे २८१ बोगस लाभार्थ्यांनी प्रथम नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने खोटी माहिती भरुन झाली असल्याने या बोगस लाभार्थ्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यानी २ लाख ९८ हजार रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे.


