कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार (विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्या लढत झाली होती. या लढतीत रोहित पवार यांचा निसटता विजय मिळवला होता. यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी रोहित पवार यांना अजित पवारांनी माझी सभा झाली नाही, म्हणून वाचलास, असे म्हटले होते. यावरून राम शिंदे यांनी कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार यांच्याकडे मागणी करत होतो. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं?, असं अजित पवार बोलले, म्हणजे हा सुनियोजित कट होता, असा आरोप राम शिंदे यांनी केला होता. आता विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी कर्जत जामखेडच्या निवडणुकीवर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, 2029 साली कर्जत जामखेड-मधून लढायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राम शिंदे म्हणाले की, एक निवडणूक झाली, पराजय झाला. दुसरी निवडणूक झाली, मी 622 मतांनी पडलो. आता जवळ आलो आणि हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस जातो त्यावेळी माणसाच्या मनात भावना निर्माण होते की पुढच्या वेळेस मी सोडणार नाही. त्यामुळे आता 2029 ला मी कर्जत जामखेडमधून लढायला तयार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी माझा प्रचार केला नाही. हे अजित पवारांनी सांगितला आहे. आता पुढच्या वेळेस करतील का? नाही हे त्यावेळेस ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून नवा वाद सुरू झाला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी हा पुतळा काढण्याची मागणी केली आहे. तर काहींनी त्याला विरोध केला आहे. याबाबत विचारले असता राम शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आणि राज्याचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या कालखंडात घेतलेल्या भूमिका आत्ताच्या कलियुगामध्ये घेतलेल्या फारकत कुणालाही करता येणार नाही. हा प्रश्न ऐतिहासिक आहे, त्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत. त्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक कसे बसवले. काढला आणि परत त्याचे काय झाले, या सर्व बाबीवर विचार विनिमय करून पुरावे तपासण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा मुद्दा कोणीही राजकीय करण्याची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याबाबतची भूमिका होती. त्यानंतर होळकर घराण्याने ते विचार आत्मसात केले. यातून काही लोकांना वाद निर्माण करायचा आहे. मात्र यात वाद निर्माण करणे योग्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले.


