वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं आहे. यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल. दरम्यान, मागील काही दिवसांपासून वक्फ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच राजकारण तापलं होतं. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवला. मात्र, अखेर हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात मॅरेथॉन चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर आता प्रतिक्रिया दिली आहे. हे विधेयक सामाजिक, आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
“संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक मंजूर करणे हे सामाजिक, आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण आहे. हे विधेयक विशेषतः अशा लोकांना मदत करेल जे दीर्घकाळापासून बाजूला राहिले आहेत. ज्यामुळे त्यांना संधी मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. संसदीय समितीच्या चर्चेत सहभागी झालेले आणि त्यांचा दृष्टिकोन मांडणाऱ्या व कायद्यांना बळकटी देण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व संसद सदस्यांचे आभार”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
“संसदीय समितीला आपले मौल्यवान विचार पाठवणाऱ्या असंख्य लोकांचेही विशेष आभार. त्यामुळे पुन्हा एकदा, व्यापक चर्चा आणि संवादाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अनेक दशकांपासून वक्फ व्यवस्थेची पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव होता. यामुळे विशेषतः मुस्लिम महिला, गरीब मुस्लिम, मुस्लिमांच्या हिताचे नुकसान झाले. संसदेने मंजूर केलेले कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्कांचे रक्षण करतील”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.


