उपअधीक्षक अमोल भारतींविरोधात खा. लंके यांची तक्रार
पोलीस महासंचालकांकडे तात्काळ कारवाईची मागणी
अहिल्यानगर : प्रतिनिधी जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाणे आणि शिर्डी विभागातील पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या वर्तनाविरोधात गंभीर आरोप होत असून खासदार नीलेश लंके यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना निवेदन देत जनतेवरील पोलिसी दहशत थांबविण्याची ठाम मागणी केली आहे.
कोल्हार गावातील उद्योजक कैलास पिलगर यांना लोणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण करून त्यांच्या गल्ल्यातील रोकड हिसकावल्याचा आरोप आहे. तक्रार केली तर परिणाम भागावे लागतील अशा धमक्याही देण्यात आल्याचे खा. लंके यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा विधवा शितल गोरे यांनी कोल्हार येथील प्रकरणाविरोधात फेसबुक लाईव्ह करून प्रश्न उपस्थित केला. याच रागातून उपअधीक्षक भारती यांनी गोरे यांना मारहाण, अश्लाघ्य भाषा व जीवघेण्या धमक्या दिल्या. तुला आणि तुझ्या मुलाला गाडीखाली चिडून टाकीन, अमोल भारती जे बोलतो तेच करतो अशी वारंवार धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. गोरे यांचा मोबाईल हिसकावून त्यातील पुरावे नष्ट केल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खा. नीलेश लंके यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, लोकशाही व्यवस्थेत पोलीस ही जनतेची सुरक्षा देणारी यंत्रणा आहे, मात्र शिर्डी विभागात नागरिकांवरच दहशत माजवली जात आहे. हा लोकशाही मूल्यांवर थेट आघात आहे. त्यांनी मागण्या केल्या आहेत की, या प्रकरणांतील सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्यात यावे, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांचे निलंब करून चौकशीचे आदेश द्यावेत, या घटनेतील सहभागी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, पोलिस दहशतीविरूध्द आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संरक्षण देण्यात यावे. ही घटना संपूर्ण जिल्ह्यात मोठया प्रमाणावर अस्वस्थता व भीती निर्माण करणारी असून यावर कठक, ठोस आणि पारदर्शक कारवाई होणे अत्यावष्यक असल्याचे खा. लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे.


