सौर पंपांची तात्काळ दुरूस्ती करा
खा. नीलेश लंके यांची मागणी
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सौर पंप नादुरूस्त
अहिल्यानगर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी सदृश अतिवृष्टी सुरू असून या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसोबतच सौर पंपांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. महाऊर्जा विभागाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी या सौर पंपांची तात्काळ दुरूस्ती करून देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतांमधील सौर पंपांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न निर्माण होणार असून शेतकऱ्यांची भविष्यातील शेतीची काळजी वाढली आहे. सौर पंपांचे नुकसान भरून काढण्यासाठी विम्याच्या माध्यमातून या पंपांची तात्काळ दुरूस्ती करून देणे गरजेचे असल्याचे खा. लंके यांनी नमुद केले आहे.


