शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा तसेच सनसुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्या – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
मोटारसायकलवरील गैरकृत्यांवर कारवाई करावी – शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर
अहिल्यानगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आणि येऊ घातलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिस प्रशासनाला तात्काळ प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील अनेक भागात कायमस्वरूपी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, सिग्नल कार्यान्वित करावेत आणि नाकाबंदी तसेच मोटारसायकलवरील गैरकृत्यांवर कारवाई करावी, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, प्रा. आशा निंबाळकर, माणिकराव विधाते, कुमारसिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, विपुल शेटीया, सुनील त्रिंबके, सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, संजय सपकाळ, संजय चोपडा, युवराज शिंदे, सारंग पंदाडे, वैभव ढाकणे, प्रा.अरविंद शिंदे, अमोल गाडे, लता पवार, बाळासाहेब पवार, सागर गुंजाळ, जॉय लोखंडे, अमित खामकर, जितू गंभीर, अंजली आव्हाड, परेश पुरोहित, साधना बोरुडे, रंजना उकिर्डे, भरत गारुडकर, सुनंदा शिरोळे, मयुरी गोरे, सुमित कुलकर्णी, ऋषिकेश ताठे, सतीश ढवन, राजेश कातोरे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर शहरात नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दसऱ्याच्या काळातही वाहतूक विस्कळीत झाली होती, आणि दिवाळीत तीच परिस्थिती राहिल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. तसेच शहरात वारंवार घडणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या घटनांबाबत पोलिसांनी कठोर कारवाई करून महिलांच्या सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच दिल्लीगेट परिसरात कायमस्वरूपी वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमावेत. प्रेमदान चौकातील सिग्नल तात्काळ कार्यान्वित करून तेथे कर्मचारी तैनात करावेत. माळीवाडा एसटी स्टँड परिसरात वाहतूक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. भिस्तबाग, कायनेटिक चौक आणि भिंगार शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी कायमस्वरूपी नेमावेत. तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन हद्दीत दररोज नाकाबंदी करण्यात यावी. बिननंबर, फॅन्सी नंबर व आवाज करणाऱ्या मोटारसायकलींवर तात्काळ कारवाई करावी.
या सर्व मागण्या तातडीने अमलात आणाव्यात, अन्यथा आठवड्याच्या मुदतीनंतर म्हणजेच १४ ऑक्टोबरपासून जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
ब्लॅक स्पोट नाकाबंदी केली जाणार असून संध्याकाळी सात ते बारा वाजेपर्यंत ठिकठिकाणी तपासणी केली जाणार आहे, वाहतूक कोंडीत आम्हीदेखील अडकलो आहे, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी बंदोबस्त असल्याने संख्या अपुरी राहते वाहतूक कोंडीचा प्रश्न फक्त पोलिसांचा नसून सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, शहरात विकासाची सुरू आहे मात्र त्या ठिकाणी ठेकेदाराने सूचना फलक लावणे गरजेचे आहे महापालिकेने शहरातील सर्व सिग्नल सुरू करून द्यावेत, तसेच स्ट्रीट लाईट बंद असलेले रात्रीच्या वेळेस रस्त्यावर सर्वत्र अंधार आहे, महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही, तुम्ही आता नगरसेवक म्हणून पालिकेत जातात तेव्हा नागरिकांचे प्रश्न सोडवून घ्यावी अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी केले.


