शिंदे गटातील २२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरेंच्या दाव्यामुळे राज्यातील राजकरणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. नागपूर हिवाळी अधिवेशनात पत्रकारांशी ते बोलत होते.
विरोधी पक्षनेत्याच्या प्रस्तावात कुठलाही बदल झाला नाहीये, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. ही बातमी कुणी पेरलीय, कधी पेरली, कुठच्या माणसाने पेरली हे माहिती आहे. तसेच सत्ताधारी एका पक्षात २ गट पडलेत. त्यापैकी एका गटातील २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेत,ते लवकरची उडी मारणार असल्याचा दावा उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय.
गेल्या वर्षभराचा अभ्यास केला तर त्या आमदारांनी सांगितलेली सगळी कामे झाली आहेत. त्यांना हवा असलेला फंड दिलेला आहे. त्याशिवाय उठ सांगितले तर उठायचे. उडी मार बोलल्यावर उडी मारायची. आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेत. नेमकं कोणी याचा धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरलीय, त्यांना कळेल. या २२ मधील एक जण स्वत:ला व्हाईस कॅप्टन म्हणतो असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.
आदित्य ठाकरेंच्या या दाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय. हे सर्व म्हणण्याकरिता असतं. उद्या कोणी हेही म्हणू शकेल की, आदित्य ठाकरेंचे २० आमदार आहेत, तेही भाजपच्या गळ्याला लागलेत, असं कोणाच्या म्हणण्याने होत नाही. आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचंय? असे उत्तर फडणवीस यांनी दिलंय. शिंदेसेना आमचा मित्र पक्ष आहे. ती खरी शिवसेना आहे, त्यामुळे मित्र पक्षाचे आमदार आम्हाला घेऊन अशा प्रकारचं राजकारण करायचं नाही, असं फडणवीस म्हणाले.


