नाशिकच्या भाजप वसंतस्मृती कार्यालयामध्येही अटलजींच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागला आणि कार्यालयाबाहेरच मोठा राडा झाला. राडा इतका मोठा होता की त्यासाठी शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी हे भाजप कार्यालयामध्ये मोठा फौजफाटा घेऊन दाखल झाले. याचं कारण होतं ते म्हणजे आयारामांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश आणि निष्ठावंतांवर झालेला घोर अन्याय.
खरं तर बुधवारी ठाकरे बंधु एकत्र आले आणि मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना अलिंगन देत दिवाळीच साजरी केली. नाशिक म्हणजे मनसे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यात काल दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवले आणि ढोल ताशांच्या गजरात बेधुंद नाचले. आणि त्याच बड्या नेत्यांनी थेट संकटमोचक गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं.
मात्र, या पक्षप्रवेशाआधी नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी रान उठवलं आणि या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला. फरांदे यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाला विरोध करण्यासाठी मोठी गर्दी केली आणि फरांदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रवेशाचा निषेध केला आणि आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे सांगितले.
तिकडे भाजप कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे यतीन वाघ, दिनकर पाटील आणि काँग्रेसचे शाहू खैरे हे आपल्या समर्थकांसह सूटाबुटात हजर झाले. हे समजताच फरांदे यांच्या कार्यालायबाहेरचा निष्ठावंतांचा फौजफाटा हा भाजप कार्यालयावर धडकला आणि परिस्थिती चिघळली. आपल्यावर अन्याय होतोय. आम्ही मागच्या अनेक वर्षांपासून पक्षात एकनिष्ठेने काम करतोय आणि ज्यांनी नेहमीच आपल्या पक्षावर सडकून टीका केली. आंदोलनावेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना शिवीगाळ केली त्यांनाच तुम्ही ग्रीन कार्पेट अंथरत आहे. मंत्री गिरीश महाजनांनी कसंबसं या कार्यकर्त्यांना सावरलं आणि श्रद्धा सबुरीचा सल्ला दिला.
सगळ्यांनाच तिकीट मिळेलच असं नाही- गिरीश महाजन
नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा या दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होता. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांचा विरोध मावळेल असे गिरीश महाजन म्हणाले. तसेच पक्षात प्रवेश घेतला म्हणजे तिकिट मिळेलच असं नाही, भाजपमध्ये आज सात-आठ जण प्रवेश करत आहेत. मात्र, या सगळ्यांनाच तिकिट मिळेल असं नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. तर गेली अनेक वर्षं कार्यकर्ते पक्षात काम करतात, त्यामुळे विरोध होणं थोड्या प्रमाणात नाराजी होणं साहजिक आहे, असे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले.
अन् देवयानी फरांदे भावुक
देवयानी फरांदे म्हणाल्या की, आपण कुणाच्याही विरोधात नसून पक्षाच्या हितासाठीच मत मांडल. अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा पक्षात प्रवेश झाला होता. जर पक्षाने तीन पॅनल केले असते तर निवडून येण्याचे स्पष्ट संकेत होते. माझा कुणालाही विरोध नाही. कार्यकर्ते सातत्याने काम करत असतात आणि पक्ष विजयी होईल अशीच आपली भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
आपल्यावर अन्याय झाला असला तरी आपण कधी जाहीर भूमिका घेतली नाही, असं सांगताना त्या भावुक झाल्या. मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती आहे. फेसबुकवर माझं मत मांडलं. मी सामान्य कार्यकर्ती आहे, त्यामुळे डोळ्यांसमोर कार्यकर्त्यांचा बळी जात असेल तर ते योग्य नाही, असं त्या म्हणाल्या.
आज घडलेली घटना आपल्याला आवडलेली नाही, असं सांगत त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की,मला कोंडीत पकडायचं असेल तर पकडा, मी घाबरत नाही या विषयावर जुन्या नेत्यांनी उघडपणे भूमिका घेतली असती, तर कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश गेला असता, असंही त्यांनी नमूद केलं. निष्ठावंत कार्यकर्त्यांची भूमिका मी वरिष्ठांकडे मांडणार आहे असं त्या म्हणाल्या.


