निर्यातशुल्क हटवूनही कांद्याचे भाव वाढेनात! किलोमागे मिळतात 10 ते 13 रुपये, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क हटविल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढतील, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली असून, कांद्याला 10 ते 13 रुपये किलोप्रमाणेा भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. परंतु कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. शेतकर्यांना इतर पिकांपेक्षा रब्बी हंगामात कांद्यातून चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती.
मात्र, कांद्याला भाव न वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या बाजार समितीत 1 हजार ते 1 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल दर कांद्याला मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च काढणेही कठीण झाले आहे. कांद्याची प्रत उत्तम असली, तरी दर घसल्याल्याने शेतकर्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे दर स्थिर आहेत. बाजारभाव कमी असल्याने कांदा उत्पादकांचा पुरता वांदा केल्याने कांदा चाळीत साठविण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे.
गेल्या काही वर्षांत तालुक्यातील शेतकर्यांचा कांदा उत्पादनाकडे कल वाढला आहे. त्यामुळे खरीप, रब्बी हंगामात कांद्याकडे शेतकर्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे तालुक्यातील काही शेतकरी दोनही ऋतूत कांदा लागवडी करीत आहेत. त्यामुळे तालुक्यात या आर्थिक वर्षात उच्चांकी कांद्याचे उत्पादन झाल्याचे दिसत आहे.
कांदाउत्पादनात वाढ झाली. परंतु कांद्याला सद्य परिस्थितीत भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जाणकारांच्या म्हणणार्यानुसार दोन ते तीन महिने भाव स्थिर राहणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे.
कांदा विकावा की चाळीत टाकावा, असा संभ्रम अवस्था शेतकर्यांची झाली आहे. खरीप हंगामाच्या अगोदर चांगला भाव मिळाला, तर ठीक नाही,तर शेतकर्यांचा उत्पन्न खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
भर उन्हाळ्यात कांदा काटणीला मजूर मिळत नाही. त्यातच उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर असताना देखील शेतकरी कांदा काढणी करीत आहेत.
कांद्याला प्रतिकिलो 20 ते 30 रुपये फेब्रुवारीमध्ये बाजारभाव होता. तो टिकून राहील, असे सर्वच शेतकर्यांना वाटले होते; पण बाजारभाव कमी होऊन 10 ते 13 रुपये किलोवर आला. त्यामुळे सर्वच शेतकर्यांनी कांदा चाळीत कांदा साठवणुक करणार आहे माझ्याकडे 700 गोणी कांदा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात बाजारभाव वाढतील हीच अपेक्षा आहे, असे जवळा येथील प्रगतशील शेतकरी राहुल हजारे यांनी सांगितले.


