अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अद्यापही हे युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाही. या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलासह नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण होत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच मध्य पुर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर लॉकडाऊनबाबतही काही अफवा पसरवल्या जात असल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे बाजारपेठांत आणि शहरांमधील छोटे दुकानदार लॉकडाऊनच्या चर्चेने चिंतेत आहेत. एवढंच नाही तर या लॉकडाऊनच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत लॉकडाऊन लागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच अशा प्रकारे लॉकडाऊन लागणार अशा अफवा पसरवल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.
सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा वाढलेल्या किमतीचा भार हा आता तेल कंपन्याच सहन करणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेलची खरेदी करावी लागणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शट डाऊनची परिस्थिती आली आहे. अशा वेळी भारतात मात्र घरगुती गॅसची कोणतीही कमतरता भासत नाही. त्यामुळे अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावू नयेत. आपल्याकडे एक महिना चालेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारने आखाती संकट काळात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली आहे. पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रूपयांची घट करण्यात आली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रूपयांवरून 3 रूपयांवर आणण्यात आला आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रूपयांवरून शून्यावर आणला आहे. इंधन दरवाढीची शक्यता लक्षात घेत उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली आहे.
दरम्यान, यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनीही लॉकडाऊनच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असं नागरिकांना आवाहन केलं आहे. देशात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच युद्धासारख्या संकट काळात संयम बाळगणं महत्त्वाचं असून अफवा पसरवणं देशासाठी धोक्याचं ठरेल अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.


