दुष्काळी पट्ट्यासाठी कृषी विद्यापीठ उपकेंद्राची मागणी
खासदार नीलेश लंके यांची केंद्राकडे ठोस मांडणी
अहिल्यानगर : प्रतिनिधी
लोकसभेच्या १८व्या अधिवेशनातील सातव्या सत्रात नियम ३७७ अंतर्गत खासदार नीलेश लंके यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. नगर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी आणि शेवगाव या तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील वरील तालुके प्रामुख्याने कोरडवाहू शेतीवर अवलंबून असून, अपुरा पाऊस, बदलते हवामान आणि घटती भूजल पातळी यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, शेती उत्पादनात घट होऊन आर्थिक ताण वाढत आहे.
खासदार लंके यांनी आपल्या मांडणीत नमूद केले की, या भागासाठी स्वतंत्र कृषी संशोधन उपकेंद्र उभारल्यास शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि शेती पद्धती उपलब्ध होतील. यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याच्या पद्धती विकसित होतील, दुष्काळी परिस्थितीत टिकणाऱ्या पिकांवर संशोधन होईल, जलसंधारण व सूक्ष्म सिंचन तंत्रांचा प्रसार होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अशा उपकेंद्रामुळे ग्रामीण युवकांना कृषी शिक्षण, संशोधन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमध्ये आवश्यक तो समन्वय नसल्यामुळे अनेक विकासकामे रखडलेली आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने थेट हस्तक्षेप करून प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी करण्यात आली.
खासदार लंके यांनी कृषी व शेतकरी कल्याण मंत्र्यांकडे विनंती करत, अहिल्यानगर जिल्ह्यातील वरील सात तालुक्यांपैकी कोणत्याही एका ठिकाणी कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. या उपकेंद्राची स्थापना झाल्यास शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


