राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफतांना ‘भारत एक हिंदू राष्ट्र’ या विषयावर ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे बोलत होते. रेशीमबाग येथील महर्ष व्यास सभागृहात हा कार्यक्रम झाला.
आज भारतामध्ये हिंदूंचे सण, उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जात आहेत. ‘गर्वाने म्हणा आम्ही हिंदू आहोत’, असे म्हणण्याची ताकद केवळ केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आहे. याचे संपूर्ण श्रेय मोदींसोबत संघाला जाते. शंभर वर्षात अनेक उपेक्षा सहन करूनही संघ आज ताठ उभा आहे. संघ ही भाजपची आई आहे. मात्र, भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पुन्हा दहा-पंधरा वर्षे वाट पाहावी लागली तरी चालेल. पण, कट्टर हिंदूच्या दहा भाजप उभ्या करण्याची ताकद संघात आहे, असेही शरद पोंक्षे म्हणाले.
स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. जोपर्यंत हिंदू समाज संघटित होऊन स्वतःच्या हक्कांप्रती पूर्णपणे जागृत होत नाही, तोपर्यंत हिंदूंचे प्रभावी एकत्रीकरण होणार नाही. भारत हिंदू राष्ट्र होता, आहे आणि राहीलच; मात्र आता प्रत्यक्ष अधिकृतरित्या भारत ‘हिंदू राष्ट्र’ घोषित व्हायला हवा, असेही शरद पोंक्षे म्हणाले.


