जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे आर्थिक व मानसिक छळाला कंटाळून एका हॉटेल व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अदानी कॅपिटलचे व्यवस्थापक मुकुंद बोरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत अशोक बाबासाहेब जाधव (वय 45) हे साईराज चायनिज सेंटर हे हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दि. 27 मार्च 2026 रोजी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी हॉटेलमधील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पत्नी सुषमा अशोक जाधव यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांचे पती हे पूर्वी अदानी कॅपिटल या वित्त कंपनीत वसुलीचे काम करत होते. त्यावेळी त्यांनी वसुलीचे पैसे अदानी कॅपिटल चे व्यवस्थापक मुकुंद बोरकर यांच्याकडे जमा करण्यासाठी दिले होते. मात्र ते पैसे पुढे जमा न करता उलट त्यांच्याकडूनच पैशांची मागणी केली जात होती.
फिर्यादीनुसार, जाधव यांनी सुमारे 2 लाख 80 हजार रुपये तसेच ग्राहकांचे सुमारे 1 लाख 80 हजार रुपये भरूनही अदानी कॅपिटल या संबंधित व्यवस्थापकाकडून वारंवार पैशांची मागणी व धमक्या दिल्या जात होत्या. तू पैसे भरले नाहीस तर तुझ्याविरुद्ध तक्रार करीन, अशी धमकी देत सतत मानसिक त्रास दिला. या त्रासामुळे जाधव हे अत्यंत चिंताग्रस्त झाले होते. त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असे कुटुंबीयांना वारंवार सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी हस्ताक्षरात चिठ्ठी व डायरीत नोंदी करून ठेवल्याची माहितीही समोर आली आहे.


