अहिल्यानगर-जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, नेवासा, अकोले, देवळाली, पाथर्डीसह विविध भागात काल वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यात गहू, हरभरा, कांदा, टरबूज, खरबूज, आंबा द्राक्षांसह अन्य पिकांना मोठा फटका बसला. अजून चार दिवस हे संकट असल्याने शेतकरी धास्तावला आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द आणि पाथर्डीतील मालेवाडी येथे शेतकर्यांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, जिल्ह्यातील संगमनेर, अकोले आणि अहिल्यानगर तालुक्यात 26 ते 29 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व वादळीवार्यामुळे झालेल्या नुकसानाची प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. या तिन्ही तालुक्यात एकूण 12 गावातील 1 हजार 104 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याचा फटका 2 हजार 703 शेतकर्यांना बसला आहे.आज 31 मार्च रोजी पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगरसह बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गारपीट होऊ शकते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव मध्ये देखील गारपीटीचा अंदाज आहे. कोकण आणि विदर्भातही वादळी वार्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


