जीवघेणा हल्ला प्रकरणात 10 वर्षांपासून फरार बाबुशेठ टायरवाले यांना अटक

अहिल्यानगर-आष्टी (जि. बीड) तालुक्यातील सावरगाव (मायंबा) येथील पवन उर्जा प्रकल्पावर काम करणार्‍या मजुरावर 2016 साली झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख बाबू सुब्रमण्यम कांबळत ऊर्फ बाबूशेठ टायरवाले याला अंभोरा पोलिसांनी अखेर मंगळवारी (31 मार्च) अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील इतर 11 संशयित आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. तेव्हापासून बाबू टायरवाले हा पोलिसांना चकवा देत पसार होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव (मायंबा) येथील पवन उर्जा प्रकल्पावर काम करणारे अनिल प्रभाकर म्हस्के यांच्यावर पगाराच्या वादातून 2016 साली 12 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात 12 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर पोलिसांनी 11 संशयित आरोपींना अटक केली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. दरम्यान, मुख्य संशयित बाबू टायरवाले हा गेल्या काही वर्षांपासून पसार होता. अंभोरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत मंगळवारी त्याला अटक केली. त्याला सायंकाळी आष्टी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुढील तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंभोरा पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles