अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्यावर जमावाकडून प्राणघातक हल्ला ; घटना सीसीटीव्हीत कैद

अहिल्यानगर – शहरातील लालटाकी परिसरात रिक्षा चालकाने अचानक यू टर्न घेतल्यामुळे दुचाकी रिक्षाला धडकून झालेल्या अपघातानंतर वाद होऊन कापड बाजार येथील व्यापारी दीपक नवलानी यांच्यावर जमावाने हल्ला करत त्यांना मारहाण केली. १ एप्रिल रोजी दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी नवलानी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात व त्यानंतर मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तीन वर्षांपूर्वी नवलानी यांच्यावर बाजारपेठेत चाकू हल्ला करण्यात आला होता.

याबाबत जखमी नवलानी यांच्या पत्नी सौ. कनक नवलानी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांच्या मुलासोबत मोपेडवर दातांच्या दुखण्याबाबत रुग्णालयात जात होत्या. अप्पू हत्ती चौकात त्यांच्या पुढे एका रिक्षा चालकाने अचानक यु टर्न घेतल्याने त्यांची मोपेड रिक्षावर आदळली. याचा जाब रिक्षा चालकाला विचारला असता तो उद्धटपणे बोलू लागला. त्यानंतर तेथे एक तरुण मोटारसायकल वर आला आणि त्यानेही फिर्यादी सोबत गैरवर्तन केले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याचे पती दीपक नवलानी यांना फोन करून सांगितले. ही माहिती मिळताच नवलानी तातडीने तेथे गेले.

त्यांनी रिक्षाचालक व त्या अनोळखी तरुणाला जाब विचारला असता सुरुवातीला किरकोळ वाद होऊन बाचाबाची झाली. मात्र, काही वेळातच मोठा जमाव जमला व जमावातील काही युवकांनी नवलानी यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना मारहाण करण्यात आली. घटनेनंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत. या हाणामारीत सोन्याची साखळी व इतर दागिनेही गहाळ झाले आहेत.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवले. घटनास्थळावरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यानुसार तपास सुरू करण्यात आला आहे. तीन वर्षापूर्वी नवलानी यांच्यावर कापड बाजारात दुकानजवळील विक्रेत्याशी झालेल्या वादातून चाकूने वार करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर जमावाकडून हल्ला झाला आहे. या हल्ल्यामागे अपघाताचे कारण दिसत असले तरी ३ वर्षापूर्वी झालेल्या वादाची या हल्ल्याला किनार असल्याची चर्चा व्यापारी वर्गात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी युवकांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

 

नवलानी यांच्यावर काही लोकांच्या गटाने केलेला हल्ला अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला ५ ते ६ टाके पडले आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
अशा प्रकारचे गुंडगिरीचे वातावरण आपल्या शहरात अजिबात सहन केले जाणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अशा कृत्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी,नगरसेवक योगीराज गाडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles