जिल्ह्यात मार्च महिन्यांच्या मध्यापासून बेमोसमी वादळी पावसाला सुरूवात झालेली असून येत्या रविवार (दि. 5) पर्यंत वादळी पावसासह गारपिठीची शक्यता कायम आहे. जिल्ह्यात आज पुन्हा ऑरेंज, उद्या शनिवारी येलो तर रविवारी पुन्हा वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, गुरूवारी दुपारपासून नगरसह जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते.
गेल्या 15 दिवसापासून जिल्ह्यात बेमोसमी पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे हजारो शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले असून कृषी आणि महसूल विभागाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. त्यात अनेक ठिकाणी पावसासह गारपिटीचा तडाखा सुरू आहे. बुधवारी पुन्हा पारनेर तालुक्यातील आठ गावात शेतकर्यांचे काढणीला आलेल्या पिकांसह, भाजीपाला व अन्य पिकांचे नुकसान झालेले आहे. दरम्यान, येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात बेमोसमी पावसाचा धोका कायम असून अनेक ठिकाणी गारपिट आणि वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ऑरेज, शनिवारी येलो तर रविवारी वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यातवीने करण्यात आलेले आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या आकडेवारीत जिल्ह्यात बुधवारी सर्वाधिक पावसाची नोंद पाथर्डी तालुक्यात झाल्याचे समोर आले आहे. यात खरवंडी व टाकळी महसूल मंडळात प्रत्येकी 42 मि.मी., माणिक दौंडी व पाथर्डी 36.5 मि.मी., तिसगाव 32.5 मि.मी., अकोला 21.5 मि.मी., नेवासा तालुक्यातील सोनई 34.5. मि.मी., सलाबतपूर 32.5 मि.मी., नेवासा बु्र. 22 मि.मी., प्रवरा संगम 32, राहाता तालुक्यातील बाभळेश्वर 24.3. मि.मी., पुणतांबा 24.3. मि.मी. राहाता 24.3. मि.मी., शेवगाव तालुक्यातील चापडगाव 18.8 मि.मी. आणि चापडगाव 22.3 मि.मी., जामखेड 10 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.


