राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षानंतर अजितदादा गटामध्ये मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला अजितदादा गटातील बड्या नेत्यांनी जाहीरपणे विरोध केला आहे. मात्र, असं असतानाच अजितदादा गटाच्या एका मंत्र्यानं शरद पवार यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच अजितदादांच्या पक्षाच्या 15 ते 20 आमदारांनीही शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठी राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष आता अधिक गंभीर रूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार गटातील आमदारांमध्ये मोठी चलबिचल सुरू असून,15 ते 20 आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.सूत्रांच्या मते, पक्षातील सतत होणारे वाद आणि अंतर्गत कलहामुळे अनेक आमदार अस्वस्थ झाले आहेत. भविष्यात आपले राजकीय भवितव्य काय असेल, याची चिंता अनेकांना सतावत आहे. मतदारसंघात पक्षांतर्गत वादावादीमुळे आपला जनसंपर्क आणि प्रभाव कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्याने थेट विलिनीकरण (पक्ष एकीकरण) या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. ही भेट गुप्तपणे झाल्याचे समजते. पक्षातील अस्थिरता आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाकडे वळण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत. काही आमदारांनी तर शरद पवार यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.


