पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या डीजीएमआय यांच्याशी आज दुपारी ३.३५ वाजता फोनवरून चर्चा केली. दोघांमध्ये दोन्ही बाजूंकडील गोळीबार, जमिनी लष्करी कारवाई तसेच हवाई आणि समुद्री कारवाई भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून थांबवण्याबाबत एकवाक्यता झाली. याबाबतच्या सूचना दोन्ही बाजूंना देण्यात आल्या आहेत. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करतील, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे.
जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढला होता. दरम्यान दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या नियंत्रणात असलेल्या जम्मू काश्मीर येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते. भारतातील अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्याला भारतीय लष्कराने वेळोवेळी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यादरम्यान आज भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली आणि दोन्ही देशांचे शस्त्रविरामाच्या मुद्द्यावर एकमत झाल्याचे पाहायला मिळाले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडे तीनच्या सुमारास पाकिस्तानच्या डीजीएमओंनी भारताच्या डीजीएमओंना फोन केला. दोन्ही अधिकार्यांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान त्यांच्या शस्त्रविरामावर एकमत झाले. त्यानुसार संध्याकाळी ५ वाजल्यापासून दोन्ही देशांकडून होणारे हल्ले थांबवण्यात आल्याचेही मिस्री यांनी सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये १२ मे म्हणजेच सोमवारी दुपारी १२ वाजता चर्चेची पुढची फेरी होणार आहे.


