राज्यातील आर्थिक दृष्टया दुर्बळ कलावंतांची संख्या झपाटयाने वाढत आहे. सरकारच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत यंदा कमालीची भर पडली आहे.
वर्षभरात ३४ हजार कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये प्रमाणे मदतीचा हात देण्यात आला आहे. विविध कलाकारांची मोठी परंपरा असलेल्या राज्यातील संगीत, नाटक, लोककला, चित्रकला, शिल्पकला आणि नृत्य क्षेत्रातील कलाकारांना ही मदत दिली जाते. सरकारने यंदा या मदतीवर सुमारे २०४ कोटी खर्च केले.
राज्यातील जेष्ठ आणि आर्थिक दृष्टया दुर्बळ साहित्यिक व कलाकरांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्याची योजना (१९५५) जुनी आहे. साहित्यिक व कलाकरांच्या अ, ब, क, ड श्रेणीनुसार ही मदत दिली जात होती. त्यावेळी आर्थिक मदत घेणारे कलाकार अतिशय कमी (६०) होते. आर्थिक अडचणीमुळे अनेक कलाकर हालाखीचे दिवस काढत असल्याचे आढळून आले होते.
शासनाने २०२४ मध्ये या याेजनेत सुधारणा केली. कलाकारांसाठी निश्चित करण्यात आलेली श्रेणी रद्द करण्यात आली. सरसकट सर्वच पात्र कलाकारांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरमहा आर्थिक मदतीची रक्कम पाच हजार रुपये केली. श्रेणी रद्द केल्याने तसेच रक्कम वाढवली गेल्याने मदत घेणाऱ्यांची संख्या झपाटयाने वाढत आहे.संगीत, नाटक, लोककला, चित्रकला आणि शिल्पकला या कला क्षेत्रातील कमीत कमी १५ ते २० वर्षाचा अनुभव असलेल्या कलाकाराला ही आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी या कलाकराची आर्थिक स्थिती दुर्बळ आणि ५० वर्षाची अट हे दोन प्रमुख निकष आहेत. उत्पन्नाचे दुसरे साधन नसलेल्या कलाकरांना हा लाभ दिला जातो.
राज्यातील जिल्हा पातळीवर या कलाकरांच्या अर्जाची छाननी केली जाते. आर्थिक मदतीची रक्कम वाढल्यानंतर गेल्या दोन वर्षात लाभ घेणाऱ्या कलाकारांची संख्या वाढली आहे. ती आता ३४ हजाराच्या घरात गेली आहे. प्रत्येक जिल्हानिहाय १०० कलाकरांचे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. या मदतीसाठी सरकारने या वर्षी २२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
याशिवाय शासनाने जिल्ह्यातील जेष्ठ कलाकारांसाठी १०० अर्जांची मर्यादा ठेवली आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून या मदतीसाठी अर्ज येत असतात. काही कलाकारांचे निधन होत असल्याने ही संख्या कमी होते पण नवीन येणारे अर्जांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यातील ३४ हजार कलावंतांना यंदा शासनाचा ‘मदतीचा हात’…
- Advertisement -


