अहिल्यानगर जिल्ह्यात कृषी विभागाने मान्यता दिलेली 3 हजार 664 खते आणि 3 हजार 730 बियाणे विक्री केंद्र असून यात खासगी व सहकारी संस्था तसेच शेतकरी गट यांचा समावेश आहे. याठिकाणी शेतकरी बांधवांनी खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत, तसेच खरेदी केलेल्या निविष्ठांची पक्की बिले घ्यावीत, यातून शेतकर्यांची फसवणूक टाळता येऊ शकते, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे.
सध्या खरिपाचा हंगाम सुरू असून काही प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. परंतु अनेकदा शेतकर्यांची बियाणे तसेच खतांमध्ये फसवणूक होते. त्यामुळे कृषी विभागाने यामध्ये लक्ष घातले असून शेतकर्यांसाठी सूचना केल्या आहेत.शासनमान्य अधिकृत बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, त्या विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे, बियाण्याचे पाकीट किंवा पिशवी सीलबंद असल्याची खात्री करून घ्यावी, घरातील सातबाराधारकाच्या नावाने शक्यतो बियाणे खरेदी करावे, याशिवाय खते खरेदी करताना जमीन आरोग्य पत्रिकेनुसार व पिकाच्या गरजेनुसार खताची मात्रा ठरवून खते खरेदी करावे, खरेदीचे बिल पिकांचा हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे, संयुक्त खतांऐवजी सरळ खतांचा वापर करावा, कीटकनाशके खरेदी करताना एका वेळेस संपूर्ण फवारणीसाठी आवश्यक तेवढेच औषध खरेदी करावे, फवारणी करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कोणत्याही स्थितीत फेरीवाल्याकडून किंवा इतर अनधिकृत दुकानातून खते, बियाणे खरेदी करू नये, यातून फसवणूक होऊ शकते, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात कृषी विभागाने मान्यता दिलेली 3 हजार 466 खासगी परवानाधारक कृषी केंद्र असून 169 सहकारी संस्था व 29 शेतकरी गटाचे खते विक्री केंद्र आहेत. यासह बियाणांचे 3 हजार 558 विक्री केंद्र असून 174 सहकारी संस्था तर 28 शेतकरी गटांना बियाणे विक्री करण्याची परवागनी कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेली आहे. यासह 1 हजार 430 कापूस विक्री केंद्र तर 2 हजार 816 ठिकाणी कपाशी विक्री केंद्र सुरु असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
शेतकरी बांधवांनी खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करत असताना सदर निविष्ठा परवानाधारक कृषी सेवा केंद्र विक्रेत्याकडूनच खरेदी कराव्यात, तसेच खरेदी केलेल्या निविष्ठांची पक्की बिले घ्यावीत. निविष्ठा खरेदी करत असताना लिंकिंग अथवा अन्य गैरप्रकार आढळून आल्यास नजीकच्या कृषी विभागाशी अथवा कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकशी तात्काळ संपर्क साधावा. शेतकरी बांधवांना येणार्या समस्येचे निराकरण तात्काळ करण्यात येईल.
– सुधीर शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद
शेतकरी बांधवांना खते, बियाणे विक्री करणारे केंद्रे विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्यासाठी सक्ती करत असतील अथवा चढ्या भावाने विक्री करत असतील तसेच बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या खरेदीबाबत आपली तक्रार असेल तर 9822446655 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पुराव्यासह तक्रार पाठवावी. त्यावर शहानिशा करून तत्काळ कारवाई करण्यात येईल, तसेच तक्रार देणार्या शेतकर्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.
शेतकर्यांना बी, बियाणे किंवा खतांबाबत काही तक्रार असेल तर त्यांनी टोल फ्री क्रमांक 18002334000 यावर संपर्क करावा किंवा तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क करावा.


