गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सर्वच स्तरावर तणाव आहे. दोन्ही देशामदील राजकीय तणाव क्रिकेटच्या मैदानावरही दिसून येत आहे. बीसीसीआयने आशिया चषकातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यात श्रीलंकामध्ये होणाऱ्या महिला आशिया चषक आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मेन्स आशिया चषकातून भारताने माघार घेतली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एकटं पाडण्याठी भारताने ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एसीसी म्हणजेच, आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सध्या पाकिस्तानकडे आहे. एसीसीचे नेतृत्व सध्या पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडे आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की,पाकिस्तानचा मंत्री ज्याचा अध्यक्ष आहे, अशा एसीसी आयोजित करणाऱ्या कोणत्याही स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ सहभागी होऊ शकत नाही. हे संपूर्ण देशाची भावना आहे.
मेन्स इमर्जिंग एशिया कपमधून माघार घेतल्याची माहिती बीसीसीआयने एसीसीला दिली आहे. भविष्यातील या स्पर्धेतील सहभागही तुर्तास थांबवला आहे. त्यामुळे मेन्स आशिया चषकातूनही भारत बाहेर पडणार असल्याचे बोलले जातेय. दरम्यान, कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. या हल्ल्याने भारत-पाक संबंध आणखी तणावपूर्ण झालेत. बीसीसीआयने आपला निर्णय भारतीय सरकारशी सातत्याने संपर्क साधून घेतल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे आशिया कप २०२५ चे भवितव्य धोक्यात आले आहे. भारतीय क्रिकेट महामंडळाशिवाय आशिया चषक आयोजित करणं तोट्याचे आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे बहुतांश जाहिरातदार भारतातून येतात. त्याशिवाय, भारत-पाकिस्तान सामना हा या स्पर्धेचा आर्थिक आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने सर्वात मोठा आकर्षणाचा भाग आहे.


