नालेसफाई की फक्त गवतसफाई? माजी नगरसेवक निखिल वारे यांचा सवाल अनुत्तरित
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – सध्या शहरातील विविध भागांमध्ये महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांवर माजी नगरसेवक निखिल वारे यांनी गंभीर सवाल उपस्थित केला आहे. “ही नालेसफाई आहे की केवळ गवतसफाई?” असा थेट सवाल करत त्यांनी महानगरपालिकेच्या कामकाजावर टीकेची झोड उठवली आहे.
अनेक ठिकाणी नाल्यांत गाळ व अडथळे कायम असताना केवळ गवत कापून फोटोसेशन करण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली. “ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येतो, तेथे योग्य ती सफाई होताना दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण मोहिमेचा हेतूच फसतो आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी महानगरपालिका आयुक्त मा. यशवंत डांगे यांना विनंती करत म्हटले आहे की, “महानगरपालिकेने लाखो रुपयांचा खर्च करून सुरू केलेल्या या उपक्रमाचा नागरिकांना खरा लाभ मिळण्यासाठी ठोस आणि प्रभावी कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे.”
“नालेसफाई वरवरची गवतसफाई न राहता, खऱ्या अर्थाने अडथळे दूर करणारी ठरावी, हीच अपेक्षा आहे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलनाचा मार्ग अवलंब करावा लागेल,” असा इशाराही निखिल वारे यांनी दिला आहे.
नगरवासीयांनीही त्यांच्या या मतास पाठिंबा दर्शवत नालेसफाईच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


