मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत एकहाती सत्ता कायम राखली. उमेदवारी अर्ज माघारीनंतर २१ पैकी १७ जागा बिनविरोध जिंकणाऱ्या गडाख पॅनलने उर्वरित चार जागांवरही सुमारे सहा हजार मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवत विरोधी पॅनलचा दारुण पराभव केला.निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्व जागांवर लढत देण्याचा दावा करणाऱ्या विरोधी पॅनलला प्रत्यक्षात सर्व जागांसाठी उमेदवार उभे करता आले नाहीत. त्यामुळे केवळ चार जागांवरच निवडणूक लढवावी लागली. या चारही जागांवर मतदारांनी गडाख पॅनलवर एकतर्फी विश्वास दाखवत विरोधकांना स्पष्ट नाकारले.
करजगाव गटातून चंद्रकांत भानुदास टेमक (६,८९५) आणि ज्ञानेश्वर रामराव दरंदले (६,७२५) यांनी दणदणीत विजय मिळविला. विरोधी उमेदवार नारायण डौले (८४७) व किरण जाधव (१,०४१) यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.
महिला राखीव मतदारसंघातून कमल चांगदेव दहिफळे (७,४०१) आणि विमल नारायण सोनवणे (७,१८२) विजयी झाल्या, तर विरोधी उमेदवार मीराबाई दिवटे यांना केवळ १,००० मते मिळाली. विरोधी उमेदवारांना अत्यल्प मते मिळाली
यापूर्वीच सोनई, घोडेगाव, खरवंडी, नेवासा, प्रवरासंगम तसेच विविध प्रवर्गांतील एकूण १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच गडाख पॅनलने विजयाची मजबूत पायाभरणी केली होती.या निकालानंतर माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा एकमुखी विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी हा विजय
मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा कौल असल्याचे सांगितले. तसेच विरोधी पॅनलकडून धनशक्तीच्या बळावर मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत मतदारांनी मतदानातून त्याला चोख उत्तर दिल्याचा दावा विजयी उमेदवारांनी केला.
…………………………………………….
पाथर्डी तालुक्यात वृद्धेश्वर कारखान्याच्या दोन जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज राहिल्याने येथे शुक्रवारी मतदान झाले होते. यामध्ये आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार आप्पासाहेब राजळे यांना 4932 व उद्धव वाघ यांना 4158 इतके मते पडून विजयी झाले. तर विरोधी शिवशंकर राजळे यांना 1642 मतांवर समाधान मानावे लागले. मतमोजणीचा निकाल लागल्यानंतर राजळे समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. यापूर्वीच सत्ताधारी आ. मोनिका राजळे गटाने 17 जागा बिनविरोध मिळवल्या होत्या. आता उर्वरीत दोन जागांही भरघोस मतांनी जिंकल्याने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.


