राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत त्यांचे ६ विश्वासू खासदार फोडले. या सर्व खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आज उद्धव ठाकरे हे वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी फुटलेल्या खासदारांवर सडकून टीका केली. त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्याच मतदारसंघात सभा घेत त्यांना खडेबोल सुनावले. ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि परत मैदानात उतरा.’, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांना केले आहे.
वाशिममध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली. फुटलेलेल्या खासदारांवर त्यांनी निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, ‘ज्याची जशी भाषा तसंच त्यांना उत्तर द्या. गद्दार जिथे दिसेल तिथे त्याला जाब विचारा. खासदारांना खोक्या खोक्याने हमीभाव मिळत आहे. शौर्य आणि भाजप हे दोन विरोधी शब्द आहेत. चोरट्यांनी पक्ष चोरला, निशाणी चोरली आणि वडिलही चोरला. शिवसेना संपली, ठाकरे फिरत नाही असे ते बोलतात. संकटाच्या छाताडावर चालून जाणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. गद्दार पळाले पण कट्टर शिवसैनिक जगवा. त्यांनी गद्दारी फक्त शिवसेनेसोबत केली नाही तर जनतेशी देखील केली. आता गद्दारीला थारा द्यायचा नाही.’
उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारावर जोरदार हल्लाबोल करत सांगितले की, ‘हिंमत असले तर राजीनामा द्या आणि मैदानात उतरा. शिवसेना फक्त आमदार खासदारांपूर्ती मर्यादीत नाही. मी इथल्या मतदारांची माफी मागायला आलो आहे. नमकहराम गेले पण कट्टर शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. दोन-चार वर्षांपासून गद्दारीची कीड लागली. आता गद्दारीला थारा द्यायचा नाही. तुमचं प्रेम आणि निष्ठा हिच माझी ताकद आहे. पक्ष चोरला चिन्ह चोरले तरी ठाकरे उभा आहे.’ तसंच, ‘आमदारांना ५० कोटी दिले तर खासदारांना किती दिले. विश्वासघात करताना आईला काय वाटले असेल.’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुखांना केला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना रोखठोक सांगितले की, ‘मी हार मानणार नाही, मी खचणार नाही. ही गद्दारीची कीड ३ वर्षे तर ३ वर्षे. हिंमत असती तर चार्टर्ड विमानाने दिल्लीला पळू गेले नसते. कुणीही प्रश्न विचारू नये म्हणून पळवापळवी सुरू आहे. गद्दार गेले तर कट्टर शिवसैनिक आमच्याकडे आहेत. आत्ता गद्दारीला थारा द्यायचा नाही. निवडणुकीसाठी आतापासून तयारीला लागा. खोके खोके घेऊन खासदार झाले. तुमच्यावर जे काही संकट येईल ते मी तुडवल्याशिवाय राहणार नाही.’, असे आश्वासन त्यांनी दिले.


