पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला सुपा येथील एमआयडीसी आणि विविध विकास कामांचा आढावा
अहिल्यानगर, – पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नारायणगव्हाण रस्ता रुंदीकरण तसेच एम. आय. डी. सी. मुळे बाधित झालेल्या गावांच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात सुपा येथे आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीमध्ये नारायणगव्हाण रस्ता रुंदीकरण कामासंदर्भात संबंधित गावातील गावकऱ्यांशी चर्चा केली. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करून त्याचा मोबदला आणि उर्वरित जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ विखे पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिले तसेच गायरान जमीन आणि अतिक्रमण नियमानुकल करण्याबाबतची कारवाई स्थानिक पातळीवरून करण्याचे त्यांनी सूचित करण्यात केले. एम.आय.डी.सी. च्या दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील पाणी प्रकल्पांनाही याचा परिणाम होत असल्याने गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये अपधूप ,बाबुर्डी गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व यावर उपाययोजना करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले. प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि कृषी विभागाने याबाबत समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
सुपा चौक ते पारनेर या रस्त्यावरील दुभाजक बसवण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्ते विकास महामंडळ यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. एमआयडीसीमध्ये स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्याची मागणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे गावातील तरुणांनी केली. यांबाबत एमआयडीसी अहिल्यानगर यांनी लक्ष द्यावे.जास्तीत जास्त स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन आणि पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.


