Sunday, February 22, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी, जिल्ह्यात २६ ते २८ मे दरम्यान मुसळधार ईशारा

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी
जिल्ह्यात २६ ते २८ मे दरम्यान मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा ईशारा
नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी

अहिल्यानगर दि. २६- जिल्ह्यात २६ ते २८ मे २०२५ दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी यलोअलर्टही जारी करण्यात आला असुन नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात भिमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भिमा नदीस दौंड पुल येथे १९ हजार ५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भिमा नदीकाठावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे.

मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत / दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणाऱ्या किंवा लोंबकळणाऱ्या केबल्‍स पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्‍ज्) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्‍यासाठी दक्षतेची बाब म्‍हणून जाहिरात फलकांच्‍या (होर्डिंग्‍ज) आजूबाजूला थांबू नये व योग्‍य ती दक्षता घ्‍यावी.

वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.

धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. धरणाचे पाण्‍यात वा नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी (Selfie) काढू नये. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे. सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे-नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. जुनाट मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाटरस्त्याने शक्यतो प्रवास करणे टाळावे.

शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी.जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे.

वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन किंवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्‍वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles