मंत्रालयातील एका कार्यालयात ५० हजारांची लाच घेताना एका क्लर्कला अटक करण्यात आली आहे. एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर एसीबीने छापा टाकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून याठिकाणी ही मोठी कारवाई केली. झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला तब्बल ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. राजेंद्र ढेरंगे या कर्मचाऱ्याला एसीबीने अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे मंत्रालयात खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहिनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास मंत्रालयातील नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावर छापा टाकला. मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या अन्न व औषधी प्रशासनाच्या कार्यालयावर हा छापा टाकण्यात आला. याठिकाणी पोलिसांनी राजेंद्र ढेरंगे या क्लर्कला लाच घेताना अटक केली. राजेंद्र ढेरंगे यांनी मेडीकलचे परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. हे पैसे घेत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईची चर्चा आता मंत्रालयात होत आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे तुमच्यापर्यंत येत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्याबाबत विचारले असता झिरवाळ यांनी ठाम भूमिका घेतली. “जर या भ्रष्टाचाराचे धागेदोरे माझ्यापर्यंत येत असल्याचे सिद्ध झाले, तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. या प्रकरणाशी माझा थेट संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. तर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर नियुक्ती आणि विलिनीकरणाच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे आपल्याविरोधात कट रचला जात आहे का, या प्रश्नावर झिरवाळ म्हणाले, “माझ्याविरोधात कुणी कट रचेल असे मला वाटत नाही. माझा स्वभाव तसा नाही. जे घडले आहे, त्याची चौकशी होईल आणि सत्य समोर येईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


