राज्यात अशोक खरात प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे कनेक्शन देखील समोर येत आहे. इतकेच नाही तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवरही गंभीर आरोप करण्यात आले. हे सर्व सुरू असताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मौन बाळगल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यादरम्यान अदिती तटकरे यांनी आज माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अदिती तटकरे म्हमाल्या की, “अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे. याचं समर्थन किंवा यासंदर्भात वेगळी भूमिका घेण्याचा कोणाचाच दृष्टिकोन असण्याचं काही कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी या संबंध प्रकरणात एक एसआयटी स्थापन केलेली आहे. एसआयटीच्या ज्या इनचार्ज आहेत, त्या एक महिला अनुभवी पोलीस अधिकारी दिलेल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे… त्यांच्या मंत्रिमंडळातील मी एक सदस्य आहे. त्यामुळे जी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, तीच मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून माझा भूमिका आहे.”
“ज्या महिलांवर अन्याय झाला, ज्या पीडित महिला आहेत यांना न्याय मिळणं हा मूळ मुद्दा आहे. त्यामुळे एक महिला म्हणून, एक लोकप्रतिनीधी म्हणून आणि महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणूनही एक विनंती केली की त्या पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे. त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे,” अदिती तटकरे म्हणाल्या.
भोंदूबाबा अशोक खरात याच्याबरोबर अनेक नेत्यांचे फोटो समोर आले होते, याबद्दलही मंत्री तटकरे यांनी भाष्य केले. हा महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखला जातो. खरातच झालेलं प्रकरण हे अतिशय निंदनीय आहे. त्याचे समर्थन कोणही करण्याचं कारण नाही. कोणत्याही नेत्याने या घटनेचं समर्थन केलं नाही. सर्व पक्षांच्या राजकीय मंडळींना हा एक धडा आहे. की पुरोगामी महाराष्ट्रात वावरत असताना आपण कुठल्याही बाबतीत अशा लोकांकडून सल्ला घेणं, पुढचं जाणून घेण्याच्या बाबतीतला सगळ्याच राजकारण्यांना मिळालेला हा एक धडा आहे, असे अदिती तटकरे म्हणाल्या.
यामध्ये वेगवेगळे फोटो समोर आले. वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांचे फोटो समोर आले. कुठल्याही राजकीय पक्षातील नेत्याने त्याने जे कृत्य केलं त्याचं समर्थन केलं का? त्याची बाजू कोणी मांडली का? तर नाही. याचा अर्थ असा की वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची भेट झाली असेल, असे अदिती तटकरे म्हणाल्या.
आज कोणीही महिला कुठल्याही पक्षाची असो कोणावरही आरोप करत आहेत. कोणी रश्मी वहिनींचे नाव घेतं, कोणी निलम ताईंचं नाव घेतं, कोणी माझ्या संदर्भात, मी स्पष्टपणाने भूमिका का मांडत नाही म्हणून नाव घेतं… सगळ्या पक्षांचे लोक वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमात त्याला भेटले असतील. याचा अर्थ असा होत नाही की या निंदनीय घटनेची कोणाला माहिती होती. जर माहिती असती तर कुठलाही महाराष्ट्रातील राजकारणी त्याला भेटला नसता याची मला एक लोकप्रतिनीधी म्हणून खात्री आहे, असे अदिती तटकरे म्हणाल्या.https://x.com/INCHarshsapkal/status/2038841292395012105?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2038841292395012105%7Ctwgr%5E931b63bb9e83c4842dadff3eeca40624ed7f10ae%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Faditi-tatkare-ashok-kharat-case-statement-maharashtra-politics-update-rak-94-5808716%2F


