अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या बोईंग कंपनीच्या विमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक दाखले देत ह्या विमानाच्या सुरक्षिततेवर आणि त्याच्या उड्डाणावर, तांत्रिक बाबींवर चर्चा होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त करताना काही संदर्भ देत बोईंग विमानाच्या तांत्रिक बाबी तपासण्यासंदर्भात आवाहन केलं होतं. तर, बोईंग कंपनीविरुद्ध गेल्या काही वर्षांत अनेक तक्रारी आल्या आहेत. डीजीसीएने एअर इंडियाला सुरक्षा उपाययोजनांबाबत अनेक पत्रे लिहिली होती. अमेरिकन सरकार आणि संसदेनेही या प्रकरणाची चौकशी केली आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माजी सहसचिव सनत कौल यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे, आता सरकारने बोईंग कंपनीच्या विमानासंदर्भाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून तपासणीसंदर्भातला रिपोर्ट डीजीसीएला सुपूर्द करावा लागणार आहे.
डीजीसीएने एअर इंडियाला लिहिलेल्या पत्रात एअर इंडियाच्या देखभाल आणि तपासणी प्रक्रियेबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात आता एटीएसचीही एंट्री झाली आहे. तर, बोईंग विमानाच्या संदर्भातने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हणजेच डीजीसीएने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सरकारने बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून DGCA ने एअर इंडिया कंपनीच्या बोईंग 787-8/9 विमानांच्या ताफ्यावर अतिरिक्त देखभाल आणि तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डीजीसीएचे महत्त्वाचे निर्देश:
1. 15 जून 2025 पासून भारतातून उड्डाण करण्यापूर्वी प्रत्येक विमानाची तपासणी बंधनकारक:
2. इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग आणि संबंधित प्रणालींची तपासणी
3. केबिन एअर कंप्रेसर आणि संबंधित यंत्रणांची तपासणी
4. इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टिम चाचणी
5. इंधन चालित अॅक्युएटर व फ्युएल सिस्टिम तपासणी
6. हायड्रॉलिक प्रणालीची सेवा स्थिती तपासणी
7. टेकऑफ पॅरामीटर्सचा आढावा
8. ‘फ्लाइट कंट्रोल इन्स्पेक्शन’ ही प्रणाली तात्पुरत्या कालावधीत दरम्यानच्या तपासणीत समाविष्ट केली जाणार आहे.
9. पॉवर अॅश्युरन्स चेक पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करणे आवश्यक.
10. मागील 15 दिवसांत झालेल्या तांत्रिक बिघाडांच्या पुनरावलोकनानंतरच देखभाल प्रक्रिया पूर्ण समजली जाईल.


