ठाकरे शिवसेनेची निकालावर प्रतिक्रिया :
जनतेचा कौल मान्य, नव्याने पक्ष बांधणी करणार : महानगर प्रमुख काळे
प्रतिनिधी : खा. निलेश लंके, मविआ विधानसभा उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मनपा निवडणूक लढली. २१ जागांवर आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हणून लढलो. पक्षाचे खाते प्रभाग तीन मध्ये योगीराज गाडे विजय एका जागे वरील विजयामुळे उघडले. नगरकरांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करू. पक्षाची पुनर्बांधणी करू. सभागृहात जरी विरोधी पक्ष म्हणून आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून संधी मिळाली नसली तरी सभागृहा बाहेरून नगरकरांच्या प्रश्नांवर ठाकरे शिवसेना विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवेल, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.
मनपा निवडणूक निकालानंतर ते बोलत होते. काळे म्हणाले, खा.लंके यांच्या माध्यमातून आम्ही लोकसभा जिंकली होती. विधानसभेला चाळीस हजारांच्या मोठ्या प्रकारे महाविकास आघाडी उमेदवाराचा पराभव झाला होता. मनपा निवडणुकीत चांगल्या जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. ही वस्तुस्थिती आहे. ती नाकारता येणार नाही. संघर्ष शिवसेनेला नवीन नाही. शिवसैनिकांनी नाउमेद होऊ नये. लोकशाहीमध्ये हार – जीत सुरू असते. मात्र या पराभवाचे वस्तुनिष्ठ, सखोल आत्मचिंतन हे करावे लागेल. त्यातून समोर येणाऱ्या त्रुटींवर आम्ही निश्चितपणे काम करू. नगरकरांसाठी यापूर्वी पेक्षाही अधिक ताकदीने आम्ही लढत राहू, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.



बांधणी करण्यापेक्षा विचार बदला, पुनर्विचार करा… नाही तर काँग्रेस सारखे नामशेष होणार..