अहिल्यानगरहून पुणे, मुंबई आणि नागपूरला अनेकजण प्रवास करत असतात. शैक्षणिक कामांसाठी विद्यार्थी आणि व्यावसायिक कामांसाठी व्यापारी नगरवरुन प्रवास करतात. अशा प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरहून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. उद्या (१० ऑगस्ट) वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. लवकरच ही ट्रेन सेवा सुरु होईल असे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी उद्या (१० ऑगस्ट) केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकावरुन अजनी (नागपूर) ते पुणे वंदे भारत, केएसआर बंगळुरू ते बेळगावी वंदे भारत आणि श्रीमाता वैष्णोदेवी कटडा ते अमृतसर वंदे भारत या तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यातील अजनी (नागपूर) ते पुणे या दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील बारावी वंदे भारत गाडी ठरणार आहे.
पुणे आणि नागपूर ही दोन्ही महानगरे वेगाने विकसित होत आहेत. या शहरांमध्ये अनेक लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग, शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था, ऐतिहासिक पर्यटनासाठीची महत्त्वाची ठिकाणे आहेत. अजनी ते पुणे या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर (आत्ताचे अहिल्यानगर) आणि दौंड कॉर्ड लाईन या स्थानकांवर थांबणार आहे.
वर्धा ते मनमाड दरम्यान अद्याप सेवा न मिळालेल्या भागाला पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेनची सेवा मिळणार आहे. त्यातही अहिल्यानगरला याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. अजनी (नागपूर) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आतापर्यंतची सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन आहे. ही ट्रेन तब्बल ८८१ किमी अंतर प्रवास करणार आहे. तिचा सरासरी वेग ७३ किमी प्रतितास असेल आणि ती मार्गामध्ये १० स्थानकांवर थांबेल.