अहिल्यानगर -महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोतवाली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या चौघांचा समावेश असलेल्या गुन्हेगारी टोळीला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
टोळी प्रमुख सतनामसिंग जितसिंग जुन्नी, टोळी सदस्य सागरसिंग बलबिरसिंग जुन्नी, सोनुसिंग रणजितसिंग जुन्नी व गोपाल राजु नायडु (सर्व रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अहिल्यानगर) अशी हद्दपार केलेल्या चौघांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 अन्वये हद्दपारीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई अमलात आणण्यात आली. सदर इसमांविरोधात रात्रीच्या वेळी घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून भारतीय दंड संहिता तसेच भारतीय न्याय संहिता सन 2023 अंतर्गत एकूण 17 गंभीर प्रकरणांची नोंद आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या आदेशानुसार सदर आरोपींना हद्दपार नोटीसची विधिवत बजावणी करून ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर त्यांना त्यांचे नातेवाईक व मित्रांच्या ताब्यात दौंड (जि. पुणे) येथे दौंड पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) हद्दीत सहा महिन्यांसाठी हद्दपार करून सोडून देण्यात आले. ही कारवाई अधीक्षक घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


