Friday, February 20, 2026

नगर शहरातील नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा महापालिकेवर मोर्चा ; राष्ट्रवादीचा इशारा

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा महापालिकेवर नागरिकांचा मोर्चा — राष्ट्रवादीचा इशारा

अहिल्यानगर : शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई नागरिकांना परवडणारी नसल्याचा आरोप करत ती तातडीने कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी निवेदन देताना महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, युवक अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, लता गायकवाड, शीतल गाडे, रणजीत नन्नवरे, अभिजीत खरपुडे, आदित्य औताडे, ओमकार फिरोदे, बाळासाहेब राऊत, शुभम निस्ताने, रोहित सरना, किरण घुले, कुणाल ससाने, निलेश घुले, शुभम टाक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगरमध्ये मुंबई-पुण्याच्या धर्तीवर पे अँड पार्किंग व्यवस्था राबविण्यात येत असून हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची कामे अद्याप सुरू असून त्यामुळे सतत वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी नो-पार्किंगचे स्पष्ट फलक नसल्यामुळे नागरिक अनवधानाने वाहने लावतात आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येते. ही दंडात्मक कारवाई सामान्य नागरिकांच्या आर्थिक क्षमतेपलीकडची असून ती तातडीने कमी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडली आहे. जर दंडात्मक कारवाई कमी करण्यात आली नाही, तर थेट महापालिकेवर नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी दिला आहे.
निवेदनात पुढे नमूद केले की, अहिल्यानगर शहरामध्ये आपल्या महानगरपालिकेकडून वाहतूक नियोजन पार्कीग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरातील ३६ रस्त्यांपैकी बहुतांशी रस्त्यांवर पे अॅन्ड पार्कची वसुली सुरु करण्यात आलेली आहे, प्रमुख रस्त्यांवर व चौकामध्ये नो पार्कीग करण्यात आलेली आहे. पुणे, मुंबईच्या धर्तीवर आपण वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी जे वाहतूक नियम लावत आहोत ते चांगले आहेत. जे नियम घालवून दिलेले आहात ते अतिशय योग्य आहेत परंतु नो पार्कीग मध्ये व नो हॉर्कसमध्ये पार्कीग गाडी पार्क केल्यास टोईंग व्हॅनदवारे उचलून दुचाकीला ७४२/- रूपये, दुचाकी क्लॅपिंग ५००/- रूपये, चारचाकी ९८४/- रुपये, चारचाकी क्लॅपिंग ७४२/- रूपये हा दंड आकारण्यात येत आहे. ही दंड आकारणी अवाजवी आहे.
हे दंडाचे दर नगरकरांना निश्चितच अजिबात परवडणार नाहीत त्यामुळे हे दंडाचे दर तातडीने कमी करण्यात यावे जेणे करून अहिल्यानगरकरांना हा अतिरिक्त दंडाचा बोजा सोसावा लागणार नाही. या दंडाबाबत सामान्य नगरकरांच्या मनामध्ये भावना अतिशय तीव्र आहेत टोईंग व्हॅन दिसली तर नागरीकांची आपापल्या गाड्या हलवण्यामध्ये धावपळ होते वृद्ध नागरिकांना तर टोईंग व्हॅन दिसली तर दंडाच्या आकरणीमुळे दडपण येते गाडी हलवण्याच्या गडबडीत ब-याच वेळा वृध्द नागरिक तसेच महिलांची धावपळ होवून दुखापत होते याबाबतचे व्हिडीओ सोशल मिडीयामध्ये दिसतात. त्यामुळे नो पार्कींगमधील गाडी उचलल्यानंतर त्याची दंडाची रक्कम ही सुधारित करून कमी करावी जेणे करून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल एवढी करावी अन्यथा आम्हाला नागरिकांसह महापालिकेवर मोर्चा काढावा लागेल. असा इशारा देण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles