Friday, February 20, 2026

विक्रम राठोड यांनी स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केली ! निष्ठावान शिवसैनिकाची बोचरी टीका

विक्रम राठोड यांनी स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केली : उपजिल्हाप्रमुख नांगरे पाटील ;

आम्ही आजही मातोश्री आणि स्व.अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिक

प्रतिनिधी : संपूर्ण हयात स्व.अनिलभैय्या राठोड यांनी मातोश्रीशी कधी गद्दारी केली नाही. छगन भुजबळ फुटले. नारायण राणे गद्दार झाले. दोन्ही वेळेस अनिल भैय्यांना ऑफर होती. पण त्यांनी गद्दारी केली नाही. मात्र कोणतही स्व-कर्तुत्व नसताना मिळालेल आयतं सुद्धा विक्रम राठोड यांना सांभाळता आलं नाही. त्यांनी मातोश्रीशी नंतर, पण त्याआधी स्वतःच्या वडिलांशी, स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केल्याची बोचरी टीका ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे पाटील यांनी केली. आम्ही आजही मातोश्री आणि स्व.अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत. मरेपर्यंत आम्ही ओरिजनल शिवसेना सोडणार नाही, असे नांगरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत विक्रम राठोड यांनी प्रवेश केला. त्यांनी ठाकरे शिवसेनेवर टीका केली होती. त्याचा खरपूस समाचार नांगरे यांनी घेतला. नांगरे म्हणाले, विक्रम मागील तीन वर्षांपासून एकनाथ शिंदेंचे उंबरे झिजवत होते. मात्र त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यांनी भाजपच्याही दारात अनेक खेटा मारल्या. तिथही त्यांची दाळ शिजली नाही. दोन महिन्यांपूर्वी यांना बैठकीसाठी मातोश्रीवर बोलवल होत. त्यादिवशी हे जालन्यात एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी दोन तास रांगेत उभे होते. प्रवेशा वेळी पुण्यात स्टेजवर बसायला साधी खुर्ची सुद्धा त्यांना कोणी दिली नाही. एवढी लाचारी त्यांनी पत्करली. कोणीही शिवसैनिक त्यांच्या बरोबर गेला नाही. ते एकटेच गेले.

नांगरे पुढे म्हणाले, जिल्ह्यात अनेक मोठमोठे नेते होऊन गेले. आजही आहेत. त्यांच्या मुलांनी राजकारणात नाव कमावलं. काहीजण आमदार, खासदार झाले. मात्र विक्रम राठोड एवढा मोठा वारसा असून देखील स्व-कर्तुत्वातून काहीच निर्माण करू शकले नाहीत. स्व. अनिलभैय्या यांच्या निधनानंतर शहर शिवसेनेचे नेतृत्व यांच्या हातात होते. पण नगरसेवक, शेकडो पदाधिकारी, शिवसैनिक त्यांना सोडून गेल. स्व.अनिलभैय्यांचा एकही सैनिक त्यांना सांभाळता आला नाही.

नांगरे पुढे म्हणाले, कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या महानगर प्रमुख किरण काळे पक्ष संकटात असताना पक्षात आले. त्यांच्यावर पक्षासाठी, नगरकरांसाठी काम करताना खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. निधड्या छातीने ते प्रसंगाला सामोरे गेले. जेलमध्ये गेले. पण विक्रम यांच्यामध्ये संघर्ष करण्याची कुवत नाही. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला तर यांनी मातोश्री विरुद्ध गरळ ओकणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचे पाय धरले. यांची लाचारी पाहून स्व.अनिलभैय्यानां स्वर्गात दुःख झालं असल. वाघासारख आयुष्य जगलेल्या स्व.अनिलभैय्यांनी संपूर्ण शहराला संरक्षण दिलं. पण विक्रम स्वतःच्या संरक्षणासाठी गद्दार सेनेत गेले. अनिलभैय्या प्रामाणिक आणि देवमाणूस होते. पण विक्रम यांनी गद्दारी केली.

जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख अनेक वेळा त्यांच्या घरी गेले. त्यांना सक्रियपणे काम करा म्हणून विश्वासात घेतले. मनपा निवडणुकीत ते सांगतील त्या सर्वांना तिकीटं सुद्धा दिली. उमेदवारांच्या मुलाखतींना बोलवून देखील ते आले नाहीत. त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची त्यांची बतावणी धादांत खोटी आहे. मनपासाठी त्यांना पक्षाने उमेदवारी देऊ केली होती. पण ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्याशी त्यांनी अभद्र युती केली. तो डाव अंगलट यायला लागला म्हणून मैदानातून पळ काढल्याचा आरोप नांगरे पाटील यांनी केला आहे.

पक्षाने स्व. अनिल भैय्यांना पस्तीस वर्ष सलग सात वेळा उमेदवारी दिली. पंचवीस वर्ष आमदारकी, मंत्रीपद, पक्षात उपनेते पद दिलं. कारण ते तेवढे कर्तृत्ववान लोकनेते होते. कोरोना काळात भैय्यांना मुंबईमध्ये उपचार मिळावेत यासाठी उद्धव ठाकरेंनी एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था केली होती. पण त्यांची सूचना ऐकली गेली नाही. मातोश्रीने कायम राठोड कुटुंबाची काळजी घेतली. भरभरून प्रेम दिलं. विधानसभेला ज्याचा सीटिंग आमदार त्याला जागा असं सूत्र जागा वाटपात महाविकास आघाडीने राज्यभर लावलं होतं. ठाकरे शिवसेनेने ही जागा मागितली होती. पण स्वतः विक्रम राठोड राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून ही जागा तुमच्याकडे घ्या अस सांगत होते. माती खात होते. त्यामुळे तिकीट विकलं असं बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही, असं नांगरे यांनी म्हटल आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles