उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज (बुधवारी, ता २८) बारामती या ठिकाणी मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत माझा मोठा भाऊ गेला. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. कुणी स्वप्नातही असा विचार केला नव्हता, असं म्हटलं आहे.
आमच्या सहकाऱ्याचा जीव या विमान दुर्घटनेत गेला आहे, पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच होईल, नक्कीच झाली पाहिजे, कारण यापुढे देखील अशा प्रकारच्या अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे, आणि तसेच या अपघाताची चौकशी देखील होईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. हे खरंतर कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल, अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. अजितदादा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे नेतृत्व करत होते, अतिशय परखड स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे, प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक गोष्टीचा अभ्यास करून बोलण्याची सवय होती, परखड स्पष्टपणा आणि निर्भीडपणे, रोखठोकपणे बोलणारे असले तरीसुद्धा चूक त्याला चूक आणि बरोबर त्याला बरोबर असे म्हणणारे ते होते, ते मनाने अतिशय निर्मळ होते, त्याचा अनुभव मी घेतला आहे, असंही एकनाथ शिंदे पुढे म्हणालेत.


