राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री असलेल्या अजित पवारांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. आज (२९ जानेवारी) त्यांच्यावर बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजित पवार यांचे काका आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवारांच्या अनाकलनीय वृत्तामुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.पुण्यातील बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात बुधवारी सकाळी अजित पवारांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केले. मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी आधीच कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली.अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली. प्रशासनावर पकड असलेला, जनतेच्या प्रश्नांवर सदैव काम करत राहणारा आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व असलेला नेता अकाली काळाच्या पडद्याआड गेल्याच्या धक्क्याने सारेच हादरले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशभरातील नेतेमंडळींनी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेते आणि कार्यकर्त्यांमधून तर बुधवारी आकाश कोसळल्याची भावना व्यक्त होत होती. पक्षाच्या नेत्यांना अश्रू अनावर होत होते तर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी शोकमग्न अवस्थेत बारामतीकडे धाव घेतली.
https://x.com/MahaDGIPR/status/2016839849756807371
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होण्याच्या २१ तास आधीच विकिपीडियाने अजित पवार यांच्या पेजवर त्यांच्या मृत्यूची तारीख अपडेट केली होती. त्यामुळे, ही दुर्घटना घडवून आणल्याचा संशय निर्माण होतो, अशा आशयाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले दावे खोटे आहेत.


