उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली
नेप्ती उपबाजार समितीतील बोर्ड व कोनशिला हटविण्याबाबत पणन संचालकांना स्मरणपत्र
कारवाई न झाल्यास कोर्ट अवमान याचिका दाखल करण्याचा अमोल येवले यांचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेप्ती उपबाजार समिती येथील बोर्ड व कोनशिला हटविण्याबाबत उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने तक्रारदार अमोल येवले यांनी पणन संचालक तसेच जिल्हा उपनिबंधक यांना स्मरणपत्र पाठविले आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीनंतरही संबंधित विभागाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याचा आरोप या स्मरणपत्रात करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या नेप्ती उपबाजार समिती परिसरातील बोर्ड व कोनशिला हटविण्याबाबत दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशानुसार सहा आठवड्यांच्या आत संबंधित फलक व कोनशिला हटविणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार ही मुदत 21 फेब्रुवारी 2026 रोजी संपुष्टात आली आहे.
मात्र, मुदत संपूनही अद्याप संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे तक्रारदार अमोल येवले यांनी नमूद केले आहे. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी पाठविलेल्या स्मरणपत्रात नमूद केले आहे की, संबंधित बोर्ड व कोनशिला हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा, न्यायालयाचा अवमान केल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नेप्ती उपबाजार समितीतील बोर्ड व कोनशिला ;अन्यथा अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा
- Advertisement -


