नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकारण तापले असून विरोधकांनी चाकणकरांसह सरकारवर जोरदार टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील अनेक मंत्री भोंदूबाबांच्या सल्ल्याने काम करतात, असा गंभीर आरोप केला. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चाकणकर या महिला आयोगाच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक अकार्यक्षम अध्यक्षा असल्याची टीका केली.
दरम्यान, राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली. “कॅप्टन अशोक खरातबाबत मला फारशी माहिती नाही. चाकणकर पुण्याच्या आहेत, त्यांना कुणीतरी तिथे घेऊन गेले असेल. पोलीस चौकशीत सर्व बाबी समोर येतील,” असे ते म्हणाले
चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी त्या अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, त्या पदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचा आहे. “महिला आयोग हे शासकीय पद असून त्यासंदर्भातील निर्णय सरकारकडून घेतला जातो. मात्र पक्षपदाबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील,” असे त्यांनी स्पष्ट केले..
चाकणकर यांचा राजीनामा उशिरा का घेतला, याबाबतही भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले. “कोणत्याही आरोपाची सत्यता तपासल्याशिवाय तातडीने निर्णय घेणे योग्य नाही. चर्चा आणि माहितीच्या आधारेच निर्णय घेतला गेला असेल,” असे ते म्हणाले.


