२८ जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. दरम्यान बारामती येथील जागा अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. या महिन्यात बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. पण महाविकास आघाडी याबाबत काय तो निर्णय घेईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली आहे पण…
बारामतीची जागा आम्ही लढलो नव्हतो, शरद पवारांचा पक्ष ती जागा लढला होता. त्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली आहे. तसंच राहुरीची जागा लढण्यासाठी आमच्याकडे तीन इच्छुक उमेदवार आहेत. बारामतीची पोटनिवडणूक आहे त्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. चर्चा होत असतात. त्यांची युती भाजपासह आहे. त्या काही महाविकास आघाडीच्या उमेदवार नाहीत. अशावेळी त्यांनी जरी चर्चा केली असली तरीही उद्धव ठाकरे काय तो निर्णय घेतील. बारामतीबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राहुरीत आमच्या पक्षाकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत. राजकारणात निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात. जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी देखील महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल. प्राजक्त तनपुरे हे तेथील माजी आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागची निवडणूक लढवलेली आहे. ते यावेळी निवडणूक लढणार आहेत की नाही, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज निर्णय होईल अशी माझी माहिती आहे. त्यानंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊ. काँग्रेस पक्ष त्यानंतर राहील. पहिली संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. कारण त्यांच्या वाटेला आलेली ही जागा आहे. काँग्रेस पक्षाचं त्या मतदारसंघात प्राबल्य आहे. आमच्याकडे तीन उमेदवार आहेत पण ही निवडणूक होणार आहे, असे त्यांनी म्हटले.
शिवसेना पक्षप्रमुखांनी बारामती संदर्भात निर्णय दिलेला नाही. भारतीय जनता पक्षाबाबत महाविकास आघाडीची एक भूमिका आहे. तरीही अजित पवारांना काळाने हिरावून नेल्याने एक प्रकारची सहानुभूती आहे हे देखील आम्हाला ठाऊक आहे. पण निवडणूक लढायची नाही, बिनविरोधच निवडणूक झाली पाहिजे हा अट्टाहास चुकीचा आहे. यशवंतराव चव्हाण यांनाही निवडणुकीला सामोरं जावं लागलं होतं. भाजपाचे लोक इतर निवडणुका लढतातच ना? आमदार फोडतात, खासदार फोडतात. ज्यांना सरकार विरोधात मत द्यायचं आहे अशा वर्गावर बिनविरोध निवडणूक हा अन्याय आहे. महाविकास आघाडीमध्ये राहुरी आणि बारामती निवडणुकांबाबत चर्चा सुरु आहे, चर्चा सुरु राहतील आणि निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एकसंध आहे आणि राहिल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


