राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाही’, अशी महत्वाची माहिती मिळत आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये दीड ते दोन लाखांपर्यंतची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. मात्र, आता या नवीन निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांना रकमेची मर्यादा नाही तर सातबाराच कोरा होणार आहे. राज्यातील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली समिती एप्रिल महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करेल. त्याचसोबत, सरकारनं ३० जूनपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने २०१७ मध्ये दीड लाखांची आणि २०१९ मध्ये २ लाखांची कर्जमाफी दिली होती. रकमेच्या मर्यादेत कर्जमाफी दिल्याने अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत. पण सध्याच्या स्थितीत राज्यातील २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीत आहेत. त्यांच्याकडे बँकांची जवळपास ३५,४७७ कोटींची थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर आता थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. या थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा उताराच कोरा केला जाणार आहे.
राज्यचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, ‘राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणारआहे. सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आली आहे. प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सरकारला सादर करेल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे.’


