देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या बिहारमध्ये या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी एक महत्त्वपूर्ण जनमत सर्वेक्षण समोर आले आहे. पोल ट्रॅकरने केलेल्या एका सर्वेक्षणात, तरुण मतदारांमध्ये राहुल गांधी हे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रीय नेते म्हणून पुढे आले आहेत. या सर्वेक्षणात 47 टक्के तरुणांनी राहुल गांधी यांना पसंती दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 39 टक्के तरुणांनी पसंती दिली. उर्वरित नेत्यांना 14 टक्के तरुणांनी पसंती दर्शवली.विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमधील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदललेली दिसून येत आहेत. जानेवारी 2024 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडून पुन्हा एनडीएमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपा आणि जेडीयूची पुन्हा युती झाली. एनडीएने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. आता भाजप आणि संयुक्त जनता दल हे दोन्ही पक्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत उतरणार आहेत.
दुसरीकडे, विरोधी पक्ष इंडिया आघाडीचे नेतृत्व तेजस्वी यादव यांच्याकडे असण्याची शक्यता आहे. मात्र इंडिया आघाडीने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यात धोरणात्मक गोंधळ असल्याचे संकेत मिळतात.या जनमत सर्वेक्षणात राहुल गांधी यांची लोकप्रियता तरुणांमध्ये लक्षणीयरीत्या वाढलेली आहे. 47 टक्के तरुणांनी त्यांना राष्ट्रीय नेता म्हणून पसंती दिली आहे. हे काँग्रेससाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष यावेळी केवळ सहायक पक्ष न राहता निर्णायक स्थानावर जाऊ शकतो.
जन सुराज पक्षाची नवी चळवळ
दरम्यान, प्रसिद्ध रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी स्थापन केलेल्या जन सुराज पक्षाकडे (JSP) बिहारमध्ये तिसऱ्या पर्यायाच्या रूपात पाहिले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षही निवडणुकीत प्रभाव टाकण्याच्या तयारीत आहे.


