अकोला : भारतीय जनता पक्षावर जनता, मतदारांचा विश्वास असून जनमत भाजप महायुतीच्या बाजूने आहे. भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आले तर केंद्र व राज्यातील डबल इंजित सरकारच्या मदतीने पुढील पाच वर्ष विकास करू शकतात, याची नागरिकांना खात्री आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत, असा दावा महसूल मंत्री तथा भाजपचे राज्याचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे व्यक्त केला.
अकोला महापालिका निवडणुकीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर निवडणूक प्रभारी विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, ‘भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यावर नागरिकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तयार केलेल्या विकासाच्या मॉडेलवर ते काम करेल. लोक भाजपच्या बाजूने आहेत. त्यामुळे ते माघार घेत आहेत, भाजपला समर्थन देतात. हे काही दमदाटीने होत नाही. ही हृदयातून केलेली कृती आहे. त्यातून बिनविरोध निवडून येत आहेत.’महापालिका निवडणुकीत सर्वाधिक इच्छुक असताना किरकोळ लोकांनी पक्षांतर केले. अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश मानून माघार घेतली. ही भाजपची ताकद आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजप उमेदवार तसेच संचलन समितीच्या नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोटेकर, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते. भाजप कार्यकर्ते पक्ष, विचार, राष्ट्रासाठी समर्पित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून ते तयार झाले आहेत, असे देखील त्यांनी सांगितले.


