मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यात आल्या. आतापर्यंत ठाकरे गट ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देऊन शिंदे गटाला डिवचत होते. मात्र, आपल्या मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच अशा घोषणा दिल्याने साहजिकच शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापल्याचे दिसून आले.
शिंदेच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुसकरांच्या कार्यकर्त्यांचा प्रभागात प्रचार सुरू होता. प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांसमोर शिवसेनेचे कार्यकर्ते समोर आल्यावर 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी देण्यास सुरूवात केली.
घोषणा देणारे दत्ता केळुस्कर म्हणाले
आमच्या तोंडातून थोडासा चुकीचे शब्द निघाले. त्यांनी जी प्रॉपर्टी जाहीर केली आहे त्यानुसार 50 खोके नाही तर ‘अकरा खोके एकदम ओके’, अशी घोषणा द्यायला हवी. त्याची जंगम प्रॉपर्टी 11 कोटी आली कुठून?? त्यामुळे आम्ही नवी घोषणा सुरू केली आहे. ही घोषणा फक्त आमचे मित्र रामदास कांबळे आणि त्यांच्या उमेदवार पत्नी यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी वैयक्तिक घोषणा आहे, त्यांच्या पक्षासाठी ही घोषणा नाही. ही लढाई होणारच आहे. कारण माझी तिकीट त्याने चोरली
या सगळ्या प्रकरणावर आता स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कुठल्या कार्यकर्त्यांनी काय घोषणा दिल्या हे मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजप मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर अशा घोषणा देण्याआधी एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारा, अशा घोषणा देणारे आज कुठे गेले ते एकदा तपासा, असा टोला मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला.


