पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतात येणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका एलपीजी गॅसला बसला असून सामान्य नागरिकांना एलपीजी गॅस सिलिंडरसाठी झगडावं लागत आहे. दरम्यान, एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारने अनेक नियम लादले आहेत. त्याचप्रमाणे जिथे शक्य आहे तिथे पीएनजी वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती जाणून घेण्याकरता दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मंत्री अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळही हजर होते. ही बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“निवासी आणि व्यावसायिक या आस्थापनांमध्ये एलपीजी आणि पीएनजीचा सुलभ पुरवठा कसा करता येईल, त्याचा निश्चित कालावधी काय, त्यामध्ये अडचणी काय आहेत, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी देशातील सर्व राज्यांच्या प्रमुखांना सेक्रेटरींना बोलावलं होतं. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, पेट्रोलिअम मंत्री हरदीप पुरी सिंग, केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा प्रल्हाद जोशी असे अनेक नेते उपस्थित होते”, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिल्लीतील बैठकीविषयी दिली.
“पीएनजीचा जास्तीत जास्त प्रचार झाला पाहिजे. तीन महिन्यांत पीएनजीचे अर्ज वैगेर करून पीएनजीच्या जोडण्या करून घेतल्या पाहिजेत. त्यादृष्टीने जिथे हे शक्य आहे तिथे काम सुरू आहे. पाण्याची वगैरे जोडणी घेतल्याशिवाय ज्याप्रमाणे ओसी दिली जात नाही त्याचप्रमाणे पीएनजीचेही करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढच्या तीन महिन्यांत कदाचित सिलिंडर बंद होऊ शकतो”, असंही भुजबळ म्हणाले.
https://x.com/ChhaganCBhujbal/status/2037826231698423963
“जिथे पाईप शक्य आहे तिथे तुम्ही पीएनजी घेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतला नाही तर तुमचा सिलिंडर बंद होणार. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या इमारतीत पीएनजी नाहीय. मी विचारलं की पीएनजी का नाही, तर त्यांनी सांगितलं की शेजारच्या इमारतीची, महापालिकेची परवानगी नाही. असं जर असेल तर तीन महिन्यात माझा सिलेंडर बंद होणार. या परवानग्यांची आता गरजच नाही अशी ऑर्डर काढली आहे” असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.


