उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आज एक महिना होत आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांचा मृत्यू झाला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत अजित पवारांविषयीविचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्याशी शेवटचे काय बोलणे झाले होते, याचीही माहिती दिली.
अजित पवारांसारखा मित्र गमावणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो. तरी आमच्यात चांगले संबंध होते, मैत्रीही होती. अजित पवार वास्तववादी विचार करणारे राजकारणी होते. राजकारणात ते अतिशय प्रासंगिक होते. कधीही अंहकारात न अडकता त्या त्या वेळी योग्य असलेले निर्णय ते घेत असत. सरकार चालवतानाही आम्ही एकत्रपणे चांगले काम करत होतो”, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
फडणवीस पुढे म्हणाले, “अपघाताच्या एक दिवस आधी आम्ही सकाळी मंत्रिमंडळ बैठकीसाठी एकत्र होतो. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर समितीच्या बैठकीतही होतो. त्यानंतर एखाद तास आम्ही एकत्र बसलो होतो. त्यावेळी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. पण दुसऱ्याच दिवशी अनपेक्षित अशी घटना घडली. याचा आम्हाला धक्का बसला. पण आता आम्ही पुढे निघालो आहोत.”
“इन्फ्रास्ट्रक्चरच्या बैठकीनंतर माझ्या अँटी चेम्बरमध्ये आम्ही बसलो होतो. तेव्हा विविध राजकीय विषयांवर आम्ही गप्पा मारल्या. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे? जिल्हा परिषद निवडणुकीत काय करायचे आहे? यावर चर्चा झाली. त्यानंतर काही वेळ आम्ही दोघांनी वेगळे बसून चर्चा केली. मला कधी वाटलेच नाही की, तो माझा त्यांच्याशी शेवटचा संवाद असेल”, अशीही आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.


